बिहारच्या आदित्य पांडे यांची कहाणी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेले आदित्य दहावीत असताना प्रेमात पडले आणि त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर झाला. अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांच्या गुणांमध्ये मोठी घसरण झाली. पुढे त्यांनी वडिलांच्या इच्छेखातर इंजिनिअरिंग पूर्ण केले, पण त्यांचे मन त्या क्षेत्रात रमत नव्हते.
ज्या मुलीसाठी त्यांनी सर्वस्व दिलं, तिच्याचकडून त्यांना धोका मिळाला. नातं तुटल्यानंतर ते पूर्णपणे खचून गेले, पण त्यांनी हार मानण्याऐवजी स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार केला. “एक दिवस मी IAS बनून दाखवेन,” असा शब्द त्यांनी स्वतःलाच दिला. यानंतर त्यांनी चांगली नोकरी सोडून UPSC ची तयारी सुरू केली.
दिल्लीमध्ये राहून त्यांनी कठोर मेहनत घेतली. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आलं, तरी त्यांनी जिद्द सोडली नाही. अखेर २०२३ च्या UPSC परीक्षेत त्यांनी देशात ४८ वा क्रमांक मिळवत IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
आज आदित्य पांडे हे झारखंडमधील रांची येथे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या यशातून त्यांनी सिद्ध केलं की, आयुष्यातील अपयश आणि प्रेमभंग यामुळे आयुष्य संपत नाही, तर त्यातूनच नवीन यशाची सुरुवात होऊ शकते.




