बारामती : एल निनोच्या प्रभावामुळे कमी झालेला पाऊस, घटलेले जलसाठे आणि नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद असल्याने बारामती शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषदेकडून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शहरातील विविध भागांना ठराविक दिवशी पाणीपुरवठा केला जाणार असून पुढील आदेशापर्यंत हे नियोजन लागू राहणार आहे. नीरा डावा कालव्यातील प्रवाह पूर्ववत सुरू होईपर्यंत हा निर्णय कायम राहण्याची शक्यता आहे.
नगरपरिषदेकडून नागरिकांना पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करण्याचे तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




